Friday, 3 February 2023

एकला चलो रे- उत्तराखंड सोलो ट्रीप

एखादी तरी सोलोट्रीप करुन पहायलाच हवी असा निश्चय बळावत चालला होता. असं एकट्याने फिरायच्या सहलीत मजा आहे कि सजा हे अशी ट्रीप केल्याशिवाय कसं कळणार? म्हटलं तयारी तर चालु करु. . . जायचं कुठे याला काही पर्याय होते. त्यातला उत्तराखंड- कुमाउ प्रदेश पक्का केला. तिथली काही ठिकाणं निश्चित केली. . . रहायची/ जेवायची व्यवस्था तसेच अंतर्गत प्रवास साधनं यावरची माहिती गोळा केली आणि अखेर १० किलोचं धोपटं पाठीवर घेउन प्रस्थान ठेवलं.

प्रथम रेल्वेने दिल्ली गाठली. तिथुन पुढील ट्रेनने रात्रीचा प्रवास करुन सकाळी काठगोदामला पोचलो. शेअर रिक्शेने हल्दवानी बसस्टँड गाठला. या ट्रीपमधे एक गोष्ट मनाशी पक्की केली होती ती म्हणजे शक्यतो लोकल बस, शेअर टॕक्सी/ आॕटोनेच प्रवास करायचा व रहायला शक्यतो होमस्टे किंवा बजेट हाॕटेल निवडायचे.

हल्दवानीला सरकारी बसस्टँड (तिथं त्याला 'रोडवेज' म्हणतात) व खाजगी बसस्टँड (KMOU) बाजुबाजुलाच आहेत. रोडवेजच्या बसेस नाॕर्मल आकाराच्या आहेत ज्या साधारणपणे मोठ्या शहरात ये-जा करतात तर kmou च्या छोट्या बसेस डोंगराळ प्रदेशातील विविध ठिकाणी जातात. माझा पहिला मुक्काम कौसानीला करायचा होता त्यामुळे मी kmou कडे वळलो. नशिबाने एक बस लगेच मिळाली. खच्चुन भरली होती पण मी 'दूर की सवारी' असल्याने कंडक्टरने (काही स्थानिक प्रवांशाचा रोष पत्करुन) मला ब-यापैकी सीट दिली. नैनितालच्या दिशेने प्रवास सुरु झाला व मी आजुबाजुला मोठ्या आवाजात चाललेल्या कुमाउ गप्पांचा त्रास करुन न घेता त्यातला बाज समजुन घेउ लागलो.

नैनिताल शहराला मुरड घालुन बस अल्मोडाच्या दिशेने निघाली व तासाभरात भोवाली या गावी पोचली. त्याआधी वाटेत बसमधुनच नीमकरोलीबाबांचा कैंचीधाम आश्रम पाहिला. या आध्यात्मिक स्थानाविषयी खूप ऐकलं होतं व इथं जाउन एखादा दिवस राहायची इच्छा होती जी या खेपेला अपूर्ण राहिली. हे बाबा म्हणजे येथिल खूप प्रसिध्द व्यक्तीमत्व होते जे आता या जगांत नाहीत. खुद्द स्टीव्ह जॉब्सने इथं काही दिवस आश्रमसेवा केली होती व नंतर तिकडं जाउन अॕपल कंपनी सुरु केली म्हणे. त्यानंतर कधीतरी झुकरबर्गही येउन गेला म्हणे. पण खातरजमा नाही. भोवालीला निम्मी गाडी रिकामी झाली. इथं एक प्रसिध्द देवीमंदिर आहे त्यासाठी नवरात्रीनिमित्त भक्तांची रीघ लागली होती.

'चाय के लिये बस दस मिनीट रुकेगी' हे वाक्य कानी पडताच मी बसबाहेर धाव घेतली. . .  एका टपरीवर ड्रायव्हर कंडक्टरसोबत थंड हवेत चहाचे दोन डोस झाले. कंडक्टरने शिफारस केली म्हणुन टपरीतल्या काचेच्या बरणीतली क्रीम बिस्कीट खाल्ली. सकाळपासुन बस पकडायच्या धांदलीत चहा घ्यायचा राहुन गेला होता त्यामुळे चहा पिल्यावर तरतरी आली. पुढील प्रवास सुरु झाला. अरुंद नागमोडी वळणं व डाव्या बाजुला कोशी नदीचे सततचे दर्शन सुखावह होते. आजुबाजुला तशी शांतता होती त्यामुळे बस आवाजाच्या तालावर माझ्या डुलक्या चालु होत्या. खैरना गावानजिक मधेमधे रस्ता खूपच खराब होता व रस्त्यांची कामेही सुरु होती. याच भागांत २०२१ साली भुस्खललाने खूप हानी झाली होती. इथुनच रानीखेतला जाणारा फाटा फुटतो.

तासा दोन तासांत अल्मोडा शहरी पोचलो. हे तसे कुमाउ मधले डोंगराळ भागातील सर्वात मोठे नगर. अर्ध्या तासाच्या ब्रेकची घोषणा झाली आणि मी छोटी सॕक घेउन बाहेर पडलो. सकाळचे ११ वाजले होते पण वर्दळ जेमतेमच. आजुबाजुला बघतो तर मिठाईदुकानांची रेलचेल. ज्याविषयी मी ऐकून होतो ती कुमाउ प्रसिद्ध बालमिठाई सर्वत्र दिसत होती. दोन ठिकाणी चव बघुन तिसऱ्याच दुकानात मी थोडी मिठाई खरेदी केली. एका फळविक्रेत्याकडुन मोठ्ठी सफरचंद व केळी घेतली. पार्लेजी गोल्डचा पुडा साथीला होताच तरीही नजर शोध घेत होती ती एखाद्या टपरी वजा धाब्याची जिथं तब्बेतीत पेटपुजा करता येईल. एका छोट्या दुकानात गरमागरम सामोसे तळले जात होते. मनात म्हटलं 'ये हुई बांत .. .' सामोसे घेउन बसमधे स्थिरावलो. झक्कास गरम सामोस्यांवर बालमिठाईचा तोबरा मारुन ड्रायवरची वाट बघत बसलो. एकट्याने फिरण्याचं एक बरं असतं. . . तुम्ही तुमच्या मनाचे छत्रपती. एखादी गोष्ट करावीशी/खावीशी वाटली तर त्याक्षणी लग्गेच अंमलात आणता येते. बसमधे पर्यटक असा मी एकटाच होतो. बाकी होते जवळपास ठिकाणी चढणारे उतरणारे. 

अल्मोडानंतरचा रस्ता अधिकच वळणावळणांचा झाला. रस्ता जेवढा कठीण व त्रासाचा त्याच प्रमाणांत निसर्ग अधिकाधिक सुंदर होत होता. आता दुपारचं ऊन जाणवत होतं पण त्रासदायक नव्हतं. थोड्याच वेळांत बस सोमेश्वर गावांत एका अतीसाध्या धाब्यावर थांबली. लोकं जेवत होती. चहा पिता पिता माझं लक्ष एका पातेल्यावर गेलं. 'ये है आलु के गुटके' . . . माझ्या प्रश्नाला हॉटेलमालकाचे उत्तर आले आणि पुढच्या काही सेकंदात माझ्या हातात भरलेली प्लेट आली. या डिशचं नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष सामना प्रथमच. लढाई चालु केली आणि गुटक्यांच्या प्रेमातच पडलो. उकडलेल्या बटाटा फोडींना मसाले चोपडुन तव्यावर थोडे परतले कि गुटके तैय्यार.. . हे चवीष्ट चटकदार गुटके बटाटाप्रेमींना हमखास आवडतील.

पुढील अर्ध्या तासांत मला कौसानीला उतरायचं होतं. शेजारच्या माणसाशी गप्पा चालु होत्या. कौसानीनंतरच्या कुठल्याशा गावातील नवरात्र देवी उत्सवासाठी तो दिल्लीहुन आला होता. मी एकटाच फिरायला आलोय म्हटल्यावर त्याने माझ्याकडे दोन सेकंद पाहुन मला "क्यु" असं विचारलं. . . मी सुध्दा त्याच्याकडे बघत हसत खांदे उडवले. माझ्याकडे उत्तरच नव्हतं. गंमत म्हणजे मलाही तोच प्रश्न पडला. गप्पांच्या ओघात त्याने मला उत्सवाचे आग्रही आमंत्रणही दिले. 'वैसेभी कल दिनभर आप अकेले क्या करोगे. . . देवीजीका दर्शन करने आ जाओ' असं म्हटल्यावर मी त्याला मनोमन साष्टांग व खरोखरचा हात जोडुन नमस्कार करत आभार मानले. बाहेर तुरळक छोटी दुकानं दिसु लागली व "कौसानीवाले सवारी आगे आ जाओ" अशी घोषणा झाली. त्या महाशयांना बाय बाय करुन मी बसमधुन उतरलो.

कौसानीच्या चौकात भर दुपारच्या टळटळीत उन्हात उतरलो. नाक्यावर तुरळक माणसं व छोट्या छोट्या दुकानांत शांत बसलेले दुकानदार. नैनिताल-रानीखेतच्या पुढील प्रदेशातील प्रमुख पर्यटन स्थळ असुनही तसे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. मोठमोठाली दुकानं, खूप वर्दळ, फेरीविक्रेते, गोंगाट गलबल या सर्व मंडळींची गैरहजेरी जाणवल्याने मी आनंदलो. धोपटं पाठीवर घेउन एका मोठ्या हॉटेलच्या बाजुने वरच्या दिशेने जाणाऱ्या डांबरी सडकेवर चढु लागलो. बसमधे मिळालेल्या सल्ल्यानुसार मी कौसानी गावातील जरा उंचीवरच्या भागात जाउन हॉटेल शोधायचे ठरविले. दुपारचं स्वच्छ उन पडलं होतं तरी खूप उकडत नव्हतं. थोडा वाराही होता. रस्त्याच्या बाजुने असलेल्या पाईन वृक्षांची सळसळ ऐकत व वृक्षांवर लगडलेली लाकडी फळे पाहत मी वळणदार चढ चढुन वरच्या पट्ट्यात आलो. दुतर्फा छोटी हॉटेल्स दिसु लागली. दोन ठिकाणी चौकशी करुन आणि एका हॉटेलवर बाहेरुनच फुली मारुन अखेर एका ठिकाणी बात बन गयी. स्वच्छ रुम, प्रशस्त गॕलरी व समोर दिसणारी हिमशिखरं पाहुन दिल खुश हो गया. घरातुन निघुन ५४ तास झाले होते तरीही रुममधे जाण्याआधी गॕलरीतल्या खुर्चीतच बसकण मारली व अद्रकवाली फिकी चाय मागवली. समोरचा अफलातुन नजारा डोळ्यांत साठवताना एवढया मोठ्या ट्रेन-लोकलबस प्रवासाचा थकवा कधीच पळुन गेला होता. पहिल्या सोलोत्रिपच्या पहिल्या मुक्कामाला सुखरुप पोचल्याचे समाधान होतेच. चहा येईतोवर समोरच्या पर्वतांकडे पहात डोळे बंद केले व बसमधे मिळालेल्या सल्ल्याला मनोमन धन्यवाद दिले. . .फ्रेश होउन बेडवर लवंडलो व खिडकीतुन थेट समोर दिसणाऱ्या त्रिशुल पर्वताकडे पाहत झोपी गेलो. . . 



सायंकाळी ५ वाजता बाहेर पडलो. म. गांधींचा अनासक्ती आश्रम समोरच्या चढावात दिसत होता. पाहतो तर तिथं २ आॕक्टोबर निमित्त लहानथोरांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सुरु होते. दोन लोकनृत्य पाहिली व आश्रम आवारात चक्कर मारली. गांधीजींनी इथं काही काळ वास्तव्य करुन अनासक्ती योगाबाबत काही लिखाणंही केलं होतं. उन्हं कलली असल्याने गारठा येउ लागला. तिथं बांधलेल्या 'हिमालय दर्शन' पॉईंटवरुन विविध शिखरं पाहिली. दुपारी पाहिले त्यापेक्षा आता हे पर्वत वेगळाच रंग दाखवित होते. . .



पाय मोकळे करायला दुपारी जिथं उतरलो होतो त्या बसस्टॉप वर जाउन हॉटेलला परतलो. गारठा चांगलाच वाढला होता. हॉटेलमालक राणाजी व शेजारील धाबामालक गोविंदजींबरोबर गप्पांचा फड जमला. भारतात लांबवरच्या ठिकाणी जो काही मी थोडाफार फिरलो त्यात निरीक्षणात आलेली एक बाब म्हणजे, तुम्ही मुंबईहून आले आहात हे कळल्यावर समोरच्याचा तुमच्याविषयी आदर हमखास वाढतो. गंमत म्हणजे अनेकांना रत्नागिरीही माहित असते ते आपल्या हापुसमुळे. गप्पांच्या साथीला पायाशी पेटवलेली शेकोटी व चहा होताच. स्थानिक लोकं ७- ७.३० वाजताच जेवतात व लवकर झोपी जातात. तुरळक पर्यटक होते पण म्हणावा तसा हंगाम अजुन सुरु न झाल्याने धाबाही बंद होण्याच्या तयारीत होता. मी सोडुन उर्वरीत पर्यटकांपैकी ९९% बंगाली होते. नवरात्रीच्या सुट्टीत सगळे उत्तराखंडात पोचले होते. मी सुध्दा लवकरच जेवलो. जेवायला 'पालक कापा' भाजी व गरमागरम मडुआ (नाचणी) भाकरी होती. जेवुन रुमच्या गच्चीत येउन बसलो. नवरात्रीनिमित्त दूरवर चालु असलेलं लयबध्द लोकसंगीत ऐकत मी गारठ्याची उब घेत होतो. काळोखामधे हिमशिखरं झोपलेली वाटत होती व मी ही त्यांचा आदर्श घेउन हळुहळु निद्रेच्या आधीन झालो.


हॉटेलमालक राणाजींबरोबर आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी ६ वाजता walk ला निघालो. सैन्यातुन निवृत्त झालेल्या राणाजींनी एक होमस्टे उभारुन हल्लीच व्यवसाय सुरु केला आहे. छान गप्पा मारत आजुबाजुच्या वृक्षराजीची माहिती देत वेगात चालणाऱ्या ६४ वर्षीय राणाजींमधे लपलेला सैनिक प्रकर्षाने जाणवत होता. एका ठिकाणी पोचलो तर समोर चौखंबा पर्वत स्वागताला उभा असल्यासारखा होता. खरेतर हे एखाद्या चौकोनाच्या चार कोपऱ्यात उभे असलेले चार पर्वत आहेत पण कुठल्याही दिशेने पाहिले तरी त्यातले तीनच दिसतात. यावर्षी मार्चमधे तुंगनाथ-चंद्रशीला ट्रेकवेळी याच चौखंबाला विरुध्द दिशेतुन पाहिले होते. डाव्या हाताला चौखंबा तर उजव्या हाताला नंदाघुंटी, त्रिशुल, नंदादेवी ही शिखरं सकाळचं उन अंगावर घेत आळस झटकत असल्यासारखी भासली. 






तासाभरात रुमवर येउन गॕलरीत चहाला बसलो. समोरील पर्वत आपापली हिमशिखरं चमकउन मला कंपनी द्यायला आधीपासुनच  हजर होती.  फ्रेश होउन नाष्टा करुन तैय्यार झालो. नाष्ट्याला कढत मोमो+भांग चटणी असा खासा बेत होता. साधारणपणे लोकं संध्याकाळी मोमो खातात. . . पण असा नियम थोडाच आहे.. भांगेच्या पानाची चटणी इथं सर्रास बनवली जाते व चवीला लागतेही झक्कास. राणाजींच्या सल्ल्यानुसार १५-२० किमी लांब असलेल्या गरुड गावी जाउन तेथील प्राचीन बैजनाथ मंदिर समुह पहायचे ठरवले. छोटी सॕक घेउन बसस्टॉपला आलो व बसची वाट पाहु लागलो. एका दुकानाबाहेर एक खूप वृध्द गृहस्थ खुर्चीत ऊन खात बसले होते. साधारण ८० च्या पुढे वय असावं. येणारा जाणारा प्रत्येक स्थानिक माणुस थांबुन त्यांना वाकुन नमस्कार करुन पुढे जात होता. मी एकाला विचारले तर कळलं कि ही इथली प्रथा आहे. 'गावका कोईभी बुजुर्ग हो. . .उसे हमलोग प्रणाम करते है'. भारी वाटलं. बस आली व मी निघालो. अर्ध्या पाउण तासाचा प्रवास पण स्थानिक साधी माणसं, त्यांच्या गप्पा, बसचा नागमोडी प्रवास, आजुबाजुची चीड वृक्षाची दाट-विरळ जंगले पाहत मी कधी बैजनाथ मंदिरांजवळ उतरलो कळलेच नाही. 

 


१० व्या शतकात बांधलेला हा १७ मंदिरांचा समुह आहे. एक मुख्य मंदिर व उर्वरीत मंदिरं आजुबाजुला पसरलेली. शैली थोडीफार गढवाल भागातील केदारनाथ, तुंगनाथ मंदिरांसारखीच. शेजारीच नितळ पाण्याचं एक मोठ्ठं तळं व त्यांत खूप सारे मासे. परिसरात किंचित वरदळ पण खूपशी शांतताच. तिथंच एका बाकड्यावर मांडी ठोकुन बसलो व वातावरणाचा आनंद घेतला. 

 



गरुड गावातल्या बाजारात एक फेरी मारुन बसने कौसानीला परतलो. दुपारच्या जेवणांत गोविंदजींनी कुमाउ भात (थोडा चिकट) व बरोबरीला 'मुली थेचुआ' रसभाजी खिलवली. 


संध्याकाळी गावाच्या दुसऱ्या दिशेत चक्कर  टाकुन आलो आणि गप्पाफडात सामील झालो. राणाजींकडुन त्यांचे सैन्यातील अनुभव, BSF व आर्मीमधील फरक जाणुन घेणं रोचक होतं. राणाजींचे ८० वर्षीय काकाही थोडावेळ गप्पांत सामील झाले. ते स्वतः CRPF निवृत्त होते. इथल्या खूप घरांमधील कोणीना कोणी सैन्यात असतोच. धाबामालक गोविन्दजींच्या व्यथा वेगळ्याच होत्या. ते नवराबायको दोघंच सर्व व्याप सांभाळतात व इंजिनियर झालेला मुलगा दिल्लीत नोकरी शोधतोय. ही प्रातिनिधीक उदाहरणं समजुन घेताना रात्र कधी चढली व शेकोटी कधी विझली समजले नाही. दुपारचे जेवण उशीरा झाल्याने रात्री फलाहार +बालमिठाई खाल्ली. 


कौसानीतील प्रसिद्ध 'स्पेस आॕब्झर्वेटरी' माझ्या होमस्टेच्या अगदी समोरच होती. तिथला रात्रीचा ११ ते १२ चा शो बुक केला होता. तोपर्यंत होमस्टे गच्चीतुन आकाशदर्शनाचा सराव केला. स्पेसशो भारीच होता. सर्व लहानथोरांनी जरुर पहावा. नशिबाने आकाश तसं स्वच्छ असल्याने आम्ही विविध ग्रह, आपली सख्खी शेजारची अँड्रोमेडा आकाशगंगा, दुरवरचा नेबुला M57 वगैरे वगैरे एका मोठ्या दुर्बीणीतुन पाहिले. पैसा वसुल शो आहे. सिजनमधे तर रात्रभर शो चालु असतात म्हणे. शोनंतर पुन्हा होमस्टेच्या गच्चीतुन आकाशदर्शनात गुंग झालो. नुकतेच मिळालेलं आकाशज्ञान स्वतःजवळच पाजळवीत उशीरा झोपी गेलो. 

रुमच्या खिडकीतुन समोरुनच माझ्याकडे पाहत असलेल्या त्रिशुल शिखराला मी सकाळी बेडवरुनच वंदन केले व कौसानीचा निरोप घ्यायची तयारी चालु केली. एकीकडे मन खट्टु होते पण दुसरीकडे नवीन ठिकाण कसे असेल याची उत्सुकताही होती.

उगवतीपासुन मध्यान्ही व नंतर मावळतीपर्यंतच्या सूर्यकिरणांना आपल्या अंगावर झेलत विविध छटा दाखविणाऱ्या हिमशिखरांचे व त्यांना तेवढीच साजेशी साथ देणाऱ्या आकाशातील ढगांच्या अनेकविध रंगांचे स्मरण करता करता बॕगा भरुन झाल्या. मित्रत्वाचं नातं निर्माण करुन दोन दिवस साथ देणाऱ्या या पर्वतटोळीला, त्यांच्या विशालतेला, धीरगंभीरतेला, खंबीरपणाला, खूप लांब असुनही अत्यंत नजीकतेचा अनुभव देणाऱ्या जादुई भावनेला मनःपूर्वक शतशः नमन करुन मी पुढे निघालो. . . 

 चौकोडीला जाणाऱ्या बसमधे ९.३० ला बसलो. गरुड बैजनाथमार्गे पहिला थांबा बागेश्वर होता. प्रवासमार्ग अत्यंत रमणीय होता. दुतर्फा पसरलेली पाईनची जंगल, उजव्या बाजुला अधुनमधुन दर्शन देणारी गोमती नदी आणि शांतपणे रस्ता कापीत चाललेली आमची बस. . . . बस्स. . और क्या चाहिये. . . 

साधारण १२ वाजता बागेश्वरला पोचलो. पोटात कावळे ओरडत होते. कंडक्टरच्या शिफारसीनुसार जवळच्याच एका खूपच साध्या धाब्यावर ताजं गरम रुचकर जेवण करुन मी तृप्त झालो. जेवणाची आॕर्डर दिल्यावर समोरच फुलके भाजुन प्लेटमधे वाढले जात होते. पोटभर जेवण त्यावर ताक हे सर्व रु. ९०/- मात्र. बस सुटायला अवधी असल्याने बागेश्वर मार्केट फिरु लागलो. एका स्वीटमार्टच्या बोर्डने लक्ष वेधले. साधं दुकान पण 'Washroom Available' असं बोर्डवर नमुद. तसं पाहिलं तर गरज नव्हती त्याला अशी सुविधा देण्याचं. ते काही रेस्टॉरंट नव्हतं. आपल्या इथं अनेक उपहारगृहात त्यांना बंधनकारक असुनही 'वॉशरुम बंद' चा कायमस्वरुपी बोर्ड असतो. अल्मोडाला घेतलेली बालमिठाई संपल्याने रिफील करायची होतीच. सैनिकाचं दुकान होतं. नावही सैनिक स्वीटमार्ट. स्मितहास्य व नमस्काराने माझे स्वागत झाले. दुकानमालकाच्या शिफारसीवरुन स्थानिक 'सिंगोडी' मिठाई खाल्ली. फणसाच्या पानासारख्या दिसणाऱ्या एका पानाचा शंकु करुन त्यात भरलेली मावा मिठाई. मिठाईकोनच जणु. वॉशरुम मी वापरले नाही पण ती सुविधा ठेवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. मला एकटं फिरायला मिळाल्याबद्दल त्याने माझं अभिनंदन केलं. गप्पांमधे आम्ही खूप हसलो. बायकोबरोबर गढवालमधे चारधाम यात्रा करण्याऐवजी हा इसम कुमाउमधे एकटा भटकतोय हे कळल्यावर त्याने मला खुळ्यात काढले कि माझा हेवा केला हे तो सैनिकच जाणे. असो. . पुढील प्रवास सुरु झाला.




छोटी गावं. . देवीच्या देवळांतली गर्दी. . . बसमधुन उतरवल्या व चढविल्या जाणाऱ्या टपालाच्या पिशव्या . . .त्यावेळी होणारे माफक संवाद. . बहुतांशी प्रवाशांशी ओळख असलेला गप्पीष्ट कंडक्टर . . .या सर्वांचे निरीक्षण करता करता चौकोडी (इंग्रजीमधे Chaukori) कधी आले कळलंच नाही. दुपारी २ वाजता निपचित पडलेल्या या शांत गावात उतरलो. पर्यटक तर नाहीच पण एखाद्या स्थानिकाचेही दर्शन नाही. कुमाउचा हा खूपच आंतला भाग त्यामुळे चोखंदळ पर्यटकच इथंवर पोचतो. बसस्टॉपला उतरलो तिथं दोन बाकड्यांवर दोन इसम गाढ झोपी गेलेले. त्यांची झोपमोड करायची जीवावर आली मग निघालो होमस्टेच्या शोधात. हॉटेल्स दिसत होती पण माणसांचा पत्ता नाही. दोन ठिकाणी फिरुन एका हॉटेलात सोय झाली. ठीकठाक वाटलं व बजेटमधे होतं म्हणून जास्त विचार नाही केला. थोडा आराम करुन संध्याकाळी Balancing Rock नावाचे ठिकाण पहायला निघालो. रस्ता चुकलो पण नंतर दोन स्थानिकांनी दिशा दाखविली त्याप्रमाणे एका टेकडीवर चढलो. एकदम नीरव शांतता. माणुस सोडा, साधं चिटपाखरुही दिसेना. कलता सूर्यदेव व थंड हवेच्या झुळुका साथीला होत्या. झपझप पावलं उचलत होतो. फोटोंमधे पाहिल्याप्रमाणे ठिकाण कुठे दिसेना म्हणुन ठरवलं हॉटेलला परतु. तेवढ्यात एक मोठ्ठा खडक पठारावरुन दरीत घुसलेला दिसला. अर्थात तो मी पाहिलेल्या बॕलन्सिंग रॉकच्या फोटोप्रमाणे नव्हताच. म्हटलं बघुन तर येउ. दगडावर जाउन समोर बघतो तर भव्य नजारा. गर्द हिरवे डोंगर. . .वरती तांबट निळसर मावळतीचे आकाश. . .खाली छोट्या छोट्या वस्त्या व त्यातील घरांतुन येणाऱ्या धुरांच्या अंधुक रेषा. . .एकुणच सर्वत्र पसरलेली सुपर शांतता.. .दिल खुश हो गया. 



अंधार होउ लागला म्हणुन हॉटेलला परतुन चहापाणी केलं व गावांत चक्कर टाकली. खूपच छोटं गाव पण मस्त हवा व आसमंतात मावळतीच्या रंगांची अक्षरशः उधळण. हॉटेल मालकाशी गप्पाटप्पा करत दुसऱ्या दिवसाचा अल्मोडाचा प्रवास कसा करायचा हा बेत पक्का केला. त्याने मला 'गुड की चाय' आॕफर केली. म्हटलं चव तर घेउ. गुळाचा छोटा खडा घेउन तोंडात घोळवायचा व त्यावर फिकी चहाचा घोट घेतला कि झाली गुड कि चाय. . .सो सिंपल. . . काळोख झाला म्हणुन सहजच गच्चीत गेलो. बघतो तर काय. . . वरती आकाशांत चांदण्यांचे प्रदर्शनच भरले होते. अफलातुन दृश्य होते. आकाशदर्शन करीतच फोन आटोपले व नंतर जेवणही गच्चीतच केले.

सकाळी जाग आल्यावर लगेच गच्चीत धावलो.  सूर्यदेवाने स्वतःच्या आगमनाची वर्दी देण्याकरिता आकाशात लालपिवळ्या रंगांच्या अनेक छटांना पाठविले होते. हिमालयासारख्या उंच पर्वतराजीत होणाऱ्या सूर्योदयाचा दिमाख काही औरच. चहाचे घोट घेता घेता उगवत्या सूर्याचे हळुहळु वाढणारे बिंब, रंगीबिरंगी आकाश, दरीतील विरळ होत जाणारे धुके, पक्ष्यांचे थवे अश्या गमतीजमती पाहताना एका दिशेला अचानक हिमशिखरे दिसली. गंमत म्हणजे कालपर्यंत हि दिसलीच नव्हती. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात चमकणा-या शिखरांना पाहुन कौसानी आठवले. पण हे पर्वत खूपच जवळ भासत होते. अंदाज घेता घेता लक्षात आले कि ही तर काल मी जिथं balancing rock पहायला गेलो तीच दिशा आहे. शूज चढवुन तडक तिकडे निघालो. जायचा रस्ता पाठ झाला होता. १५-२० मिनीटात त्या दरीत घुसलेल्या महाकाय शिळेवर पोचलो. समोरचे दृश्य अप्रतिम विलोभनीय होते. काल जी हिमशिखरे ढगांच्या आड आपलं अस्तित्व पूर्णपणे लपवुन दडी मारुन बसली होती ती आज जणु उन खाण्यासाठी बाहेर आली होती. काल संध्याकाळी याच ठिकाणाहून पाहिलेला निसर्गाचा देखावा आजच्या देखाव्यापुधे फिका वाटु लागला. इथुन निघायचं मन होईना पण पुढचा मोठ्ठा प्रवास माझी वाट पाहत होता.





 

पुढील प्रवास सकाळी लवकर सुरु करायचा असल्याने निसर्गदेवाला नमस्कार करुन रुमवर परतलो. पहिल्या बसने बेरीनाग या ठिकाणी पोचलो. इथुनच मला अल्मोडासाठी बस मिळणार होती. खरतर माझा बेत चौकोडीच्या आणखीन पुढे जाउन मुन्सीयारी व धारचुला फिरुन यायचा होता. त्यासाठी आणखी ३-४ दिवस ठेवले होते पण मध्यंतरीच्या काळात माझा अचानक श्रीनगर दौरा ठरला व मी दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरु केला. बेरीनागला अडीज तासाच्या प्रतिक्षेनंतरही बस न आल्याने अखेर शेअर टॕक्सीने प्रवास सुरु केला. या भागातील शेअर टॕक्सीचा माझा पहिलाच अनुभव. प्रवास उत्तम सुरु होता. नागमोडी वळणांचे पण चांगले रस्ते, सर्वत्र पाईनची जंगले, थंड हवा व गाडीतील कुमाउ लोकगीते...एकुण माहौल छान जमला होता. वाटेत धाब्यावर साधं चविष्ट पोटभर जेवण झालं. इथली थाळी ही पोटभरच असते. एक्स्ट्रा पोळी/भाजीचे जास्त पैसे वगैरे प्रकार नाही. दरही सर्वत्र साधारणपणे सारखाच रु. ८०-१००. 



अल्मोडाला पोचलो तेव्हा ३ वाजत होते. उन जाणवत होतं पण मी म्हणत नव्हतं. अल्मोडा शहराच्या खालच्या पट्ट्यातील भागातुन वर जायला एक पक्के बांधकाम केलेली घाटी- चढाईची वाट आहे त्यावरुन धोपटे पाठीला लावुन निघालो. दसर्याचा दिवस होता म्हणून खूप वर्दळ होती. नेहमीप्रमाणे दोन वेगवेगळ्या ठिकाणी अंदाज घेउन एका हॉटेलमधे चेकइन केले. त्याआधी एक गंमत पाहिली. एका राक्षस पुतळ्याची मिरवणुक मस्त वाजतगाजत चालली होती. राक्षस छान सजवला होता. छोटी मुलंमुली मिरवणुकीसमोर नाचत होती. पण राक्षसाला एकच तोंड होते, दहा नव्हती. असं का याचं उत्तर मला हॉटेल रिसेप्शनला मिळाले. शहरातील दसरा मिरवणुकीची पूर्ण रोचक माहिती मिळताच मी फ्रेश होउन तडक बाजारात निघालो. 

एका चौकात जाउन बघतो तर विविध आकार-रुपाच्या अक्राळविक्राळ राक्षसांचे जवळपास १५ पुतळे वेगवेगळ्या मिरवणुक गाड्यांवर उभे होते. जोराजोरात गाणी लावुन तरुण लहान पोरंटोरं नाचत होती. शहराच्या विविध भागातील मंडळांनी वेगवेगळा राक्षस पुतळा बनविला होता. आपल्याकडील गणपती विसर्जन मिरवणुकीचा माहौल होता. सर्वांत शेवटी दशमुखी रावणाचा पुतळा व त्याच्याही मागे राम लक्ष्मण सीता हनुमान व वानरसेनेच्या वेषात लहान मुलं होती. मिरवणुक बघता बघता एक मोठे स्वीटमार्ट दिसले. पोटांत थोडी भूक व समोर पदार्थांची रेलचेल. आलूटिक्कीने श्रीगणेशा करुन नंतर सामोसाछोले व जिलेबी हाणली. रबडी संपली होती. एखाद्या गावांत/शहरांत गेल्यावर जर तिथला स्थानिक उत्सव चालु असेल तर नक्कीच अनुभवावा. आबालवृध्द छान छान कपडे घालुन फिरत असतात. वातावरणात उत्साह असतो आणि मुख्य म्हणजे खाद्यपदार्थांची मांदियाळी असते.. . एकूणच संध्याकाळ मस्त गेली. एक वैशिष्ट्यपूर्ण उत्सव अगदी अचानकपणे अनुभवायला मिळाला. दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात उ.प्र. मधुन आलेला एक पर्यटक म्हणाला कि अश्या प्रकारची विविध राक्षस पुतळ्यांचा समावेश असलेली येथील दसरा मिरवणूक पहायला लोकं लांबलांबुन येतात. 



दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच्या बसने हल्दवानीला निघालो. कुमाउ पर्वतीय प्रदेशाला टाटा करीत सकाळच्या थंड हवेत वळणावळणांचा संथ बसप्रवास एका लयीत चालला होता. फक्त चारच दिवस झाले होते पण आठवणी आयुष्यभराच्या साठल्या होत्या. त्यांना उजाळा देतादेता बस खैरना गावांत नाष्ट्याला थांबली. समोरच्या धाब्यावर गरमागरम पराठे, समोसे, पुरीभाजी तयार होती. एक मोठी परात भरली होती आलुगुटक्यांनी. गुटके व चहाचा समाचार घेउन पुढे निघालो. नैनिताल येण्याआधी वाटेत काकरीघाट आले जेथे स्वामी विवेकानंद आश्रम व कैचीधाम आश्रम आहे. नैनितालच्या थोडं पुढे धुक्यातुन प्रवास चालु असता बस अचानक थांबली. ब्रेकडाउन. हा एक अनुभव बाकी होता. तासभर वाया गेला व नंतर एका शेअर टॕक्सीने हल्दवानीला पोचलो.



उष्मा चांगलाच जाणवत होता. नशिबाने दिल्लीसाठी एसी बस मिळाली त्यामुळे संध्याकाळी आरामात काश्मीरीगेटला पोचलो. जम्मुची ट्रेन रात्री उशीरा होती. म्हटलं तोवर जीवाची दिल्ली करु. चांदनी चौक गाठले. खूप गर्दी, खूप दुकानं, फुललेले बाजार, खाद्यपदार्थ ठेले यांत हरवुन गेलो. प्रसिद्ध कुरेमल कुल्फी दुकानात प्लम कुल्फी चाखली. खूप खास नाही वाटली. पराठेगल्लीच्या दिशेत चालत निघालो तर वाटेत माझा वीकपॉईंट रबडीकुल्फी फालुदा खाल्ला. नंतर रस्ता चुकुन ओल्ड दिल्लीच्या गल्ल्यांमधे घुसमटलो. शेवटी बाजार बघत बघत पराठेगल्ली पार करुन मुख्य रस्त्यावर येउन एका बाकड्यावर विसावलो. आजुबाजुचा चकचकीत गर्दीने फुललेला माहौल बघत थोडी विश्रांती घेतली व स्टेशनकडे निघालो. वाटेत कोपऱ्यावरील एका ठिकाणी छोलेभटुरे हाणुन चां.चौ. ला टाटा केलं. 

सकाळी लवकर जम्मुला उतरलो. छोट्या बसने मुख्य बस स्टँडवर आलो. श्रीनगरपर्यंतचा प्रवास रस्तामार्गाने व तोही बसनेच करायचा ठरवले होते पण बसची सोयच नव्हती. शेवटी एका शेअर टॕक्सीत बसलो. बाकी प्रवासी मिळेपर्यंत दोन तास गेले. पर्यटक श्रीनगरला विमानानेच जातात. जम्मु व श्रीनगरची फक्त स्थानिक जनताच रस्तामार्गाने ये जा करते. या मार्गावर बस सुविधा अगदीच तोकडी त्यामुळे सर्व भर शेअर टॕक्सीवरच. ३०० किमी चा प्रवास सुरू झाला. उधमपुरपर्यंत मस्त हायवे आहे. नंतर मात्र खराब एकेरी रस्ता. वाटेत चहाला थांबलो. ११ वाजत आले होते व मी फक्त एका पारलेजी वर जगलो होतो. नाष्ट्याला राजमा चावल व चहा घेतला. तिथं मी खाण्यासारखं तेवढंच होतं. सहप्रवासींमधे एक वयस्कर सरदारजी, दोन काश्मीरी तरुण व आणखी एक सद्गृहस्थ होते. सर्व सहप्रवासी व ड्रायव्हर कधी काश्मीरी तर कधी हिंदीत बोलत होते. माझी विचारणा झाल्यावर व मी मुंबईहून आलोय सांगितल्यावर सर्वांनी आदराने पाहिले. मुंबईचा समुद्र व वडापावची खुशाली विचारली गेली. वाटेत 'प्रेम दी हट्टी' नावाच्या छोट्या दुकानाजवळ काश्मिरी तरुणांनी गाडी थांबवली व दुकानात गेले. मिठाई दुकान आहे हे समजल्यावर मी सुध्दा गेलो. नेहमीचेच प्रकार होते पण त्यांत एक 'पाटिसा' प्रकार वेगळा वाटला म्हणुन थोडी खरेदी केली. आपली सोनपापडी जर पातळ लेयरमधे बनवली तर जशी दिसेल तसेच काहीसे होते. ड्रायवरनेही थोडी मिठाई घेतली व प्रवास सुरु झाल्यावर आमच्यात वाटली. पुढील रस्ता आणखी खराब होता. पत्नीटॉप बायपासला श्यामाप्रसाद मुखर्जी बोगदा लागला. जवळपास १० किमी लांबीचा टनेल. भारी आहे. पुन्हा खराब रस्ता लागला. आता प्रवास कंटाळवाणा व न संपणारा वाटत होता. खूप अवजड वाहन वाहतुक, रस्ता कामे, खराब रस्ते, धुळ, मेंढ्यांच्या लांबचलांब कळपांना घेउन पूर्ण रस्ता व्यापुन चालणारे मेंढपाळ. . . सहनशक्ती संपत होती. बरं आजुबाजुचा निसर्गही सुंदर वगैरे नाही. रामबाण नावाच्या गावी पोचलो व पुन्हा एक चहा झाला. ड्रायवरचीही कमाल होती. अश्या रस्त्यावरून ड्राईव करणे निश्चितच भयंकर होते. काश्मिरी तरुण रामबाणला उतरणार होते. त्यांनी सल्ला दिला की बनिहालला उतरुन तिथुन श्रीनगरची लोकल ट्रेन पकडा. आम्ही तसेच केले. हा अनुभव अविस्मरणीय होता. स्थानिकांच्या सोयीसाठी असलेल्या या ट्रेनमार्गावरील ७-८ छोट्या स्टेशनला थांबत थांबत जाणारी ही ट्रेन २ तासांनी श्रीनगरला पोचली. या २ तासांत चढउतरणारी स्थानिक जनता व प्रवासात दुतर्फा येणारी छोटी गावे यांचे जवळुन दर्शन झाले. अजिबात माहित नसलेला व अचानकपणे अनुभवाला आलेला हा ट्रेनप्रवास सुखद झाला.

श्रीनगरला उतरुन एका गच्च भरलेल्या लोकल बसने मुख्य शहरात आलो व तश्याच दुसऱ्या बसने लाल चौकात सायंकाळी ६ ला पोचलो.  माझा अवतार व पाठीवरील धोपटं पाहुन दोन्ही कंडक्टरनी मला सहकार्य केले. लाल चौकच्या आसपासच्या हॉटेलमधे रहायच्या उद्देशाने मी आजुबाजुचा अंदाज घेतला. कडक सैनिक बंदोबस्त होता पण बाजार ओसंडुन वाहत होता. रस्त्याच्या बाजुला विविध दुकाने, खाद्यस्टाॕल, त्यावरील स्थानिकांची गर्दी. तुरळक पर्यटकही दिसत होते. अल्मोडा हॉटेलातुन निघुन ३६ तास झाले होते. मी नखशिखांत धुळीने माखलो होतो. जम्मु श्रीनगर रस्ताप्रवासाची हौस पुरती फिटली होती. आता हवं होतं एक स्वच्छ हॉटेल व तेही लगेच. प्रसिद्ध लालचौकातील अतीप्रसिध्द घंटाघराखाली उभा राहुन चहुबाजुचा अंदाज घेताघेता पाठी वळुन बघतो तर एक मोठे हॉटेल दिसले. चांगले वाटले. आत जाउन रुम घेतली. अपेक्षेपेक्षा खूपच चांगले हॉटेल व ते ही रास्त दरांत मिळाले.

स्वच्छ फ्रेश होउन कहावा पिउन खाली उतरलो. सूर्यास्त होउन गेला होता. बाजार अधिकच फुलला होता. घंटाघर टॉवर तिरंगा रंगातील रोषणाईत अक्षरशः झळकत होता. टॉवरच्या माथ्यावर आपला राष्ट्रध्वज दिमाखात फडकत होता. जवळपास ३० वर्षांहुनही अधिक कालावधीनंतर २०२२ च्या २६ जानेवारीला घंटाघरावर तिरंगा फडकला होता. भारतीय सैन्य व काश्मिरी जनता या दोहोंचही हे यश होतं.. . असो. . . सर्व परिसर विक्रेते व खरेदीदारांनी ओसंडुन वाहत होता. वातावरणात एक प्रकारचा उल्हास व उत्साह जाणवत होता. एका हातगाडीवर पाहिलं तर मोठ्या आकाराच्या शिंगाड्यामधील गर काढुन आपल्या समोरच भाजुन खायला मिळत होते. शिंगाडे खात खात मुख्य रस्ताबाजार पार करुन मी बाजुच्या दुकानांकडे मोर्चा वळवला. इथं तशी चांगलीच शांतता होती. एका स्टॉलवर मी काही जॕकेट्स पाहिली पण मला हवे तसे न मिळाल्याने दुकानदाराला सॉरी म्हणुन व त्याचे आभार मानुन पुढे जाउ लागलो तसा तो माझ्याकडे बघत स्मितहास्य करत काश्मिरी भाषेत एक वाक्य बोलला. माझा प्रश्नार्थक चेहरा पाहुन तेच वाक्य पुन्हा बोलला. मला हसु आल्यावर म्हणाला कि मैने बोला, 'आप बहोत अच्छे इन्सान हो'. मग मी ही त्याचे कौतुक केले व आमच्या थोड्या गप्पा झाल्या. बाजुचा दुसरा दुकानदारही सामील झाला व आम्ही तिघांनी शिंगाडे संपवले. त्यांचं मुख्य म्हणणं होतं- 'आपको यहांपे कैसा लग रहा है? कुछ तकलीफ नही ना? आप आओ और काश्मीर घुमो'. . . रात्री लवकर जेवण आटोपुन लवकर झोपी गेलो. त्याआधी रुमच्या खिडकीतून बाहेर नजर टाकली तर रस्त्यावर एकदम शांतता होती. सैन्याच्या एकदोन गाड्या इकडून तिकडे गेल्या एवढंच. त्या शांततेत तिरंगा रोषणाईत चमकणारे घंटाघर अधिकच छान दिसत होते व सुरक्षिततेची ग्वाही देत होते. 


या सोलो ट्रीपची शेवटची सोलो सकाळ जरा लवकरच झाली. खाली रस्त्यावर साफसफाई चालली होती. चोहीकडे नजर टाकल्यावर एक चहाची हातगाडी दिसली. थंड सुखद हवेत तरतरी आणणाऱ्या कहावाची मजा घेत घेत दोन किमीची रपेट करुन त्याच चहावाल्याकडे येउन गाडीवरील पदार्थांचे अवलोकन सुरु केले. विविध प्रकारचे बेकरी पदार्थ होते. तिथं येणारे स्थानिक लोकं, आॕटो ड्रायव्हर्स लोकं घेत होते ते पदार्थ म्हणजे नुन चाय (दुधाचा खारट चहा), गिर्दा (जाड खुसखुशीत रोटी), लवासा (मोठी पातळ रोटी), याशिवाय शिरमल, साधा चहा (तिकडे लिप्टन चहा म्हणतात) वगैरे होतेच. सुरुवात मी नुन चाय व बरोबरीला गिर्दाने केली. चहावाले अंकल तसे वृद्ध होते. मला गिर्दा देताना त्यांनी खास बटर लावुन दोन्ही बाजुनी शेकुन दिला. चहा पीत पीत मी एका बंद दुकानाच्या पायऱ्यांवर बसलो. हळुहळु मरगळ झटकत एका नव्या दिवसाची सुरुवात करणारा लाल चौक परिसर मी तिथंच रेंगाळत पाहत बसलो व थोड्याच वेळात तिथुन निघालो. हॉटेलवर जाउन तासाभरात तयार होउन मला मुंबई पुण्याहुन विशेष ऑफ बिट पर्यटन मोहिमेसाठी येणाऱ्या एका गृपमधे सामील होउन माझ्या पहिल्या सोलो ट्रीपचा दि एंड होणार होता. श्रीनगरजवळील् या विशेष प्रोग्राम मध्येही खूप धमाल आली.

माझ्या पहिल्यावहिल्या सोलो ट्रीपने मला खूप काही भरभरुन दिले. या आठवडाभरांत मला भेटलेली माणसं, ठिकाणं, वाहनं, रस्ते, खाद्यपदार्थ, निसर्गाची विविध विस्मयकारी दृश्य या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. या प्रवासात मला प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मी ऋणी आहे. धन्यवाद


राहुल


 

 

1 comment:

  1. मस्त वर्णन...वाचताना सर्व डोळ्यासमोर आले....

    ReplyDelete